जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा; संजय राऊत म्हणाले..
मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यासोबतच जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, आपला नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत. आमचा आणि त्यांचा DNA एक आहे. आम्ही लढणारे आहोत. या देशात संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा – Asia Cup 2023 स्पर्धेच्या सर्व सामन्यांच्या वेळा जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणुकीत भाजपने दिली होती. पण ते भाजप आहे ते अधिकार काढून घेत आहेत. आता सगळा कारभार नोकर शहाच्या हाती देत आहेत. तुम्हाला लोकशाही मान्य नाही हे दिसतंय. राज्यपालांच्या हाती तुम्ही कारभार देणार आहे. राज्यपाल महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणात दिसतात. बाकी कुठं दिसत नाहीत. आम्ही या विधेयकाला विरोध करणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह यांनी काल अजित पवार यांचे कौतुक केले यावरून संजय राऊत म्हणाले की, असंच कौतुक २०२४ पर्यंत ठेवा. २०२४ च्या निवडणुकीनंतरही अजितदादांचं कौतुक कायम ठेवा. ज्यांच्यावर आरोप केले. भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच सोबत घेतलं. मांडीला मांडी लावत सरकारमध्ये बसवलं, असंही संजय राऊत म्हणाले.