‘मंदिर वही बनाएंगे’च्या घोषणेवरून संजय राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
मुंबई | २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभु श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मात्र, हे मंदिर अयोध्येत वादग्रस्त जागेवर बांधण्यात आलं नसून तिथून पुढे असलेल्या चार किमी अंतरावर बांधण्यात आलं आहे. त्यामुळे यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे, असा भाजपाचा नारा होता. पण तुम्ही तिथं जाऊन पाहा मंदिर बनवलं आहे की नाही. जिथे मंदिर बनवण्याच्या चर्चा सुरू होत्या, तिथं मंदिर बनवलेलं नाही. तिथून चार किमीवर मंदिर बांधण्यात आलं आहे. ते कोणीही बांधलं असतं. पण त्यावर आम्हाला चर्चा करायची नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे. यावर भाजपान बोलायला हवं.
हेही वाचा – संक्रांतीमुळे भाज्यांचे गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे मार्केटचे ताजे दर
अयोध्येतील बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेच्या योगदानाविषयी देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राऊत म्हणाले, बाबरी मशीद पाडली तेव्हा डरपोक लोक पळून गेले होते. मैदान सोडून जाणाऱ्या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिराच्या योगदानावर प्रश्न विचारणे ही संघनीती आहे. स्वतःची नामर्दांगी लपवायची आणि दुसऱ्यांच्या शौर्यावर बोट दाखवायचं हा रामाचा अपमान आहे.
राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिलेले तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली होती. या देशात लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुकांना सामोरे जायचं हे भाजपाचं षडयंत्र आहे, असाही खळबळजनक आरोप राऊतांनी केला. अयोध्येत भाजपाचं कार्यालय बनवलं आहे का? राम सर्वांचा आहे. आमंत्रण आलेल्या किंवा न आलेल्या प्रत्येकाने राम मंदिरात जायचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.