जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्त्र
पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी काहीही बोलले नाहीत
मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. यावेळी अतिरेक्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे वाहनाने पेट घेतला होता. यामध्ये राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान शहीद झाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारला चांगलेच सुनावले आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारला ३६५ दिवस निवडणुकांच्या राजकारणात, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याच्या कारस्थानात अडकून पडले आहे. त्यामुळे पुलवामा, उरी, पठाणकोटपासून कालच्या पुंछ-जम्मू मार्गापर्यंत आमच्या जवानांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत. २०१६ मध्ये देशात नोटाबंदी लादली तेव्हा काळ्या पैशाबरोबर दहशतवाद संपविण्याचेही कारण देण्यात आले होते. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामाचा हल्लादेखील नोटाबंदीनंतरच झाला होता. मात्र त्यावर पंतप्रधान काहीही बोलले नाही. आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिक्राची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
देशात गृहमंत्री व भक्तांचे प्रतिपोलादी पुरूष अमित शाह हे कामाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचा भार त्यांच्यावर आहे. पुन्हा २०२४ आधी देशातील सर्व विरोधी पक्ष मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला पुन्हा विजयी करायचे या कामातही ते व्यस्त आहेत. गृहमंत्री, संरक्षणमंत्री व पंतप्रधान राजकीय कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पाकड्या अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीरात लष्कराच्या वाहनांवर बॉम्ब फेकले. त्यात आपल्या पाच जवानांना हौतात्म्य प्रप्त झालं. काश्मीर खोरे शांत नाही व दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत हे पुन्हा उघड झाले, असंही म्हटलं आहे.
भारताच्या दुष्मनांना धडा शिकवू, गोळीने उत्तर देऊ, पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवू, पाकने गिळलेला कश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू व ते करण्याइतकी ५६ इंचाची आपली छाती असल्याचे पंतप्रधानांकडून छातीठोकपणे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कश्मीरच्या भूमीवर आणि लडाख, अरूणाचलच्या भूमीवर उलटेच घडताना दिसत आहे. मोदी हे कालपर्यंत युद्धाची भाषा करीत होते, ते आता बुद्धीची भाषा बोलू लागले. सत्य सांगायचे तर पाकड्यांसमोर ते युद्धाची भाषा करतात, पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.