‘भारत, इंडिया, हिंदुस्तान काय जातंय ३ नावं घ्यायला?’; राज ठाकरेंचं वक्तव्य
मुंबई : इंडिया आणि भारत या नावांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. भारत, इंडिया, हिंदुस्तान काय जातंय ३ नावं घ्यायला काय जातंय, असं परखड मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे. ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही. मी इंग्लंडला गेल्यावर शेक्सपिअरचं घर पाहिलं. ते जपून ठेवण्यात आलं होतं. आमची माणसं किती मोठी होती. ती किती मोठी होऊन गेली हे सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो आपला नसतो. आपल्याकडे संमेलन भरतात. लोक येऊन बोलतात. पण, पुढे काही होत नाही.
हेही वाचा – गणपती बाप्पा मोरया! २ कोटी किंमतीच्या नोटांनी सजवलं गणपती मंदीर
आपण कोण माणसं निवडून देतो, कोण आमच्यावर राज्य करतं, कुणाची किती लायकी आहे, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे. आजूबाजूचं राजकारण गढूळ होत आहे. भविष्यातील पिढ्यांना काय सांगणार आणि काय दाखवणा आहोत? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
भारत-इंडिया किंवा हिंदुस्तानाला काय जातंय ३ ही नावं घेण्यास, ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कुसुमाग्रजांनी ‘पन्नाशीची उमर गाठली’ ही कविता लिहिली होती. ही कविता मंत्रालयातही लावली होती. पण, जागा चुकली वाटतं. ही कविता महाराष्ट्रातील प्रत्येकानं वाचली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठीपण काय असते, हे जगाला कळण्यासाठी आपल्याकडील मराठी साहित्याचा इतर भाषेत अनुवाद होणे गरजेचे आहे. मी गेले अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करतोय. चांगला अनुवाद करणारी माणस शोधत आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.