‘मणिपूरमध्ये सरकारने भारतमातेची हत्या केली!’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेची खासदारकी परत मिळाली आहे. आज पहिल्याच दिवशी राहुल गांधींनी मणिपुर मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मणिपूरमध्ये सरकारने भारतमातेची हत्या केली, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटलं आहे. मी मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो. तिथे महिलांशी बोललो. मुलांशी बोललो. जे आपल्या पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नाही. एका महिलेला मी विचारलं, तुमच्याबरोबर काय झालं? तर एक महिला म्हणाली, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला गोळी मारली गेली. मी रात्रभर त्याच्या प्रेताबरोबर झोपले होते.
यांनी मणिपूरमध्य हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात, असं राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा – ‘धर्मवीर २’ चित्रपटाची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर आलं समोर
#WATCH | Congress MP Rahul Gandhi says, "They killed India in Manipur. Not just Manipur but they killed India. Their politics has not killed Manipur, but it has killed India in Manipur. They have murdered India in Manipur." pic.twitter.com/u0ROyHpNRL
— ANI (@ANI) August 9, 2023
मी मणिपूरमध्ये माझ्या आईच्या हत्येविषयी बोलतोय. आदरानंच बोलतोय मी. माझी एक आई इथे बसली आहे, दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसाचार थांबवत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. भारताचं सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. पण तुम्ही सैन्याचा वापर करत नाही आहात. कारण तुम्हाला हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारायचं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
मोदी हिंदुस्थानच्या ह्रद्याचं ऐकत नाहीत, तर इतर दोन व्यक्तींचं ऐकतात. रावण दोन लोकांचं ऐकायचा. मेघनाथ आणि कुंभकर्ण. तसंच नरेंद्र मोदी दोन लोकांचं ऐकतात. अमित शाह आणि अदाणी. लंकेला हनुमानानं जाळलं नव्हतं. लंकेला रावणाच्या अहंकारानं जाळलं होतं. रामानं रावणाला नव्हतं मारलं. रावणाच्या अहंकारानं त्याला मारलं होतं. तुम्ही पूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूर, हरियाणात तुम्ही तेच करत आहात. पूर्ण देशाला तुम्ही जाळायला निघाला आहात. तुम्ही पूर्ण देशात भारत मातेची हत्या करत आहात, असंही राहुल गांधी म्हणाले.