पीएमपीला अद्यापही प्रवेश नाहीच!; मंत्र्यांच्या सूचनेनंतरही विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : लोहगाव येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पीएमपीला जागा उपलब्ध झाली, तर प्रवाशांना सोयीचे आणि अल्प तिकिटदरात प्रवास करणे शक्य होईल. त्याबाबत प्रवाशांसह केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री यांनी नवीन टर्मिनलमध्ये पीएमपी बसला जागा द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही पीएमपी बसला अद्यापही जागा मिळाली नाही. एरोमॉल प्रशासनामुळे ही जागा मिळत नसल्याची चर्चा आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रामवाडी ते पुणे विमानतळदरम्यान बससेवा सुरू करण्यात आली आहे; परंतु या बसला नवीन टर्मिनलवर परवानगी नसल्याने बस एरोमॉलच्या शेजारी बाहेर थांबविली जाते. प्रवाशांनी याबाबतचा प्रश्न केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर उपस्थित केला होता.
त्यानंतर त्यांनी विमानतळ प्रशासनाला पीएमपी बस आत सोडण्यास परवानगी देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला एक महिना उलटला, तरी पीएमपीला टर्मिनलमध्ये जागा मिळालेली नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासन मंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचेच दिसत आहे.
हेही वाचा – जलसंपदाच्या त्या जागांचे सर्वेक्षण करा; मंत्री विखे- पाटील यांच्या नियामक मंडळाच्या बैठकीत सूचना
या बसला एरोमॉलच्या बाजूलाच उभे राहावे लागते. विमान प्रवास करून आलेल्या प्रवाशांना बस दिसत नाही. त्यामुळे ते नाईलाजाने ऑनलाइन कॅब बुक करतात. त्यासाठी प्रवाशांना २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. तोच प्रवास पीएमपी व मेट्रोने ५० ते ६० रुपयांमध्ये होऊ शकतो. असे असताना पीएमपीला विमानतळ प्रशासनाकडून थांबासाठी जागा का दिली जात नाही. नक्की टाळाटाळ कोणाच्या फायद्यासाठी, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
विमान आणि मेट्रो प्रवाशांना ये- जा करण्यास सोयीचे व्हावे, यासाठी पीएमपीकडून फिडर सेवा सुरू करण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रवाशांसाठी मार्गावर एसी बस सोडण्यात येत आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही, असे वारंवार सांगितले जाते. मुळात पीएमपीला सोयीचे ठिकाण आणि प्रवाशांना बाहेर येताच बस उपलब्ध झाली, तर प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल; परंतु विमानतळाच्या बाहेर एखाद्या कोपऱ्यात बस उभे केल्यावर प्रवाशांना ती दिसत नाही. त्यामुळे प्रवाशी विमानतळावरून थेट एक्सिलेटरने एरोमाॅलकडे जातात आणि तेथून मेट्रोने पुढे जातात. बस समोर उभी दिसल्यावर प्रवाशांना सोयीचे होईल आणि आर्थिक फटकाही बसणार नाही. मात्र, जागेअभावी पीएमपीचा प्रतिसाद घटत असून, दुसरीकडे खासगी कॅबला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.