शहरात अनधिकृत फलक लावू नका; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

पुणे : ‘कसबा पेठ मतदारसंघात स्वच्छतेसाठी अभियान सुरु झाले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घातली जावी, विद्रूपीकरण थांबावे यासाठी आमदार हेमंत रासने यांनी अनधिकृत फलक मुक्त कसब्याची घोषणा केली आहे. यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद द्यावा, कोणीही अनधिकृत फलक लावू नयेत असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
कसबा पेठ मतदारसंघात आयोजित ‘स्वच्छता नारायण महापूजा’ कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संदीप कदम, पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानांतर्गत उपक्रमांतर्गत रमणबाग प्रशालेजवळील बंद करण्यात आलेल्या उकिरड्याच्या (क्रॉनिक स्पॉट) ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. साफसफाईच्या वस्तूंची विधिवत पूजा करण्यात आली. रासने यांच्या पुढाकारातून महापालिकेने मतदारसंघातील २६ उकिरडे बंद केले आहेत. त्या ठिकाणी ‘स्वच्छता नारायण महापूजा’ करण्यात आली.
हेही वाचा – महापालिकेतही आता वाहतूक नियोजन विभाग; आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली मान्यता
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘रासने यांनी स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात हे अभियान यशस्वी होईल. हेमंत रासने म्हणाले, ‘‘मतदारसंघातील २६ उकिरडे आपण बंद केले आहेत. आता पुढील आठ दिवसात सार्वजनिक ठिकाणी लावलेले सर्व अनधिकृत फलक काढून टाकले जातील.
स्वारगेट घटनेबाबत पोलिस आयुक्तांसोबत माझे बोलणे झाले. नराधम आरोपीला पकडून त्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मोहोळ यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.