‘माझ्या आईनं देशासाठी मंगळसुत्र कुर्बान केलंय’; प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
Priyanka Gandhi | काँग्रेसने ज्या योजना आणल्या त्यातून त्यांची धोरणं जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना सगळी मदत करणं आहे. जे घुसखोर आहेत त्यांना काँग्रेसची मदत होते आहे. मी माता भगिनींना सांगू इच्छितो की यांचा अर्बन नक्षलवादाचा विचार हा तुमच्या गळ्यात तुमचं मंगळसूत्रही ठेवणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावरून जो वाद निर्माण झाला त्यानंतर आता प्रियांका गांधींनी सोनिया गांधींचं उदाहरण देत मोदींवर टीका केली आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस पक्ष विभाजन धार्जिणा आहे. साठ वर्षांत फक्त त्यांनी त्यांची तिजोरी भरली बाकी काही केलं नाही. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) देशासाठी शहीद झालं. काँग्रेस पक्ष तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही असं मोदी म्हणतात. ७० वर्षांपासून देश स्वतंत्र आहे. त्यातल्या ५५ ते साठ वर्षांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. कधी कुठल्या स्त्रीचं मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचं उदाहरण आहे का? असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंची भाजपा आणि मोदी शाह यांच्यावर जोरदार टीका; म्हणाले..
इंदिरा गांधींनी युद्ध झालं तेव्हा त्यांचं सोनं या देशाला दिलं. माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झालं आहे. वास्तव हे आहे की महिलांचा संघर्ष काय? हे यांना ठाऊक नाही. महिलांचा सेवाभाव हा देशाचा आधार आहे. मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर ते कधीही अशा अनैतिक गोष्टी बोलले नसते. शेतकऱ्याला कर्ज झालं की त्याची पत्नी दागिने गहाण ठेवते. घरात लग्नकार्य असेल तर महिला त्यांचं सोनं गहाण ठेवतात. मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्याने अनेक महिलांची बचत संपली तेव्हा मोदी कुठे होते? लॉकडाऊनमध्ये मजूर पायी चालले, त्यावेळी महिलांनी दागिने गहाण ठेवले होते तेव्हा मोदी कुठे होते? शेतकरी आंदोलनात शेकडो शेतकरी शहीद झाले, त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार मोदींनी केला का? मणिपूरमध्ये एका लष्करी जवानाच्या पत्नीची विवस्त्र धिंड काढण्यात आली त्यावेळी मोदींनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का? असा प्रश्नही प्रियांका गांधींनी उपस्थित केला.
महिलांना घाबरवलं जातं आहे. मंगळसूत्राचा आरोप करुन त्यांना मतदान केल्याचं आवाहन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या देशातल्या नेत्याने नैतिकता सोडून दिली आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबलं आहे. विरोधकांना कमकुवत करण्यासाठीच हे केलं जातं आहे. मागच्या दहा वर्षांत या सरकारने काहीही काम केलेलं नाही. मणिपूरच्या भगिनींचे अश्रू पुसण्यासाठी मोदी का गेले नाहीत? असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.