‘लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील’; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. ४ जून रोजी देशभरातील सर्व जागांची मतमोजणी होईल. मात्र, त्यानंतर दोन पक्ष लोप पावतील, असं माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल मविआच्या बाजूने लागेल. जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. नेते काय सांगतात यापेक्षा मोदी नकोत ही एक सुप्त लाट आहे. मोदींची तारांबळ झाली आहे. धावपळ होत आहे. जर तुम्ही ४०० पारचा नारा दिला आहे, तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात?
हेही वाचा – तोंडात सत्तेचा बोळा कोंबला असता, तर उद्धव ठाकरे मोदींविरोधात बोलले असते का? : राज ठाकरे
तुमचं सरकार येणार हे निश्चित असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा. त्यांना पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय घेऊन ते बोलत आहेत. जी भाषा त्यांनी शरद पवार, राहुल गांधींबाबत वापरली, त्यामुळे १० वर्षं सत्तेत असलेली व्यक्ती आपल्या १० वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेत नाहीच. पण अपूर्ण आश्वासनं पूर्ण करणार का? यावरही काही बोलत नाहीत. ते भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत बोलत नाहीत. फक्त काँग्रेस आली तर तुष्टीकरण होईल, तुमचं मंगळसूत्र घेऊन जातील, तुमच्या घरातली एक खोली घेऊन जातील अशी अनेक न पटणारी, लोक चक्रावून जातील अशी विधानं पंतप्रधान करत आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमने-सामने आहेत. तीन-तीन दोन्ही बाजूला. या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसं दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठे जातील ते आत्ता मी सांगत नाही. पण दोन पक्ष दिसणार नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.