राम मंदिराच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी भावूक; म्हणाले, “मी प्रभू रामाची माफी मागतो..”
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या ५०० वर्षांचा वनवास आज संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज दुपारी १२.२९ मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्र आज अयोध्येच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामलल्ला अयोध्येत परतले आहेत. प्रभू श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत. हे वातावरण, हा क्षण हे सगळं आपल्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४ ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. ही नव्या कालचक्राची सुरुवात आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशात उत्साह मोठ्या प्रमाणावर वाढला. देशातल्या लोकांमध्ये रोज एक नवा विश्वास निर्माण होत होता.
आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत. आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांन ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा – प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची नेमकी खासियत काय? त्या मूर्तीचे वैशिष्ट्ये नक्की जाणून घ्या..
#WATCH | Ayodhya: Prime Minister Narendra Modi says, "Today, I also apologise to Lord Shri Ram. There must be something lacking in our effort, sacrifice and penance that we could not do this work for so many centuries. Today the work has been completed. I believe that Lord Shri… pic.twitter.com/v6F8cLcO23
— ANI (@ANI) January 22, 2024
माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही मी नमन करतो. मी दिव्य चेतना आपल्या शेजारी आहेत असं वाटतं आहे मी त्यांनाही नमन करतो आहे. आज मी प्रभू रामाची माफीही मागतो आहे. आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आपण इतकी युगं हे करु शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरुन काढली आहे. मला विश्वास आहे की प्रभू राम आज आपल्याला माफ करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
बऱ्याच कालावधीपासून ज्या आपत्ती येत आहेत त्या संपल्या. त्यावेळी रामाला १४ वर्षे वनवास सहन करावा लागला. तर या युगात आपल्याला शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला आहे. भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतिमध्ये रामाचं चित्र आहे. संविधान असित्त्वात आल्यानंतरही काही दशकं रामाची जन्मभूमी कुठली त्याचे खटले चालले. न्यायपालिकेचे आभार मानतो त्यांनी न्यायाची लाज राखली. प्रभू रामाचं मंदिरही न्यायिक पद्धतीनेच उभं राहिलं आहे. आजच्या घडीला मंदिरांमध्ये उत्सव होत आहेत, आज सगळा देश दिवाळी साजरी करतो आहे. आज सगळ्या देशात घरोघरी रामज्योती प्रज्वलित केली जाईल याचा मला विश्वास आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.