‘काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या सभेत बोलताना मोदी व भाजपावर टीका करण्याबाबत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. इचलकरंजी येथील राजकीय न्याय हक्क निर्धार सभेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं की ‘त्यांच्या पक्षात महिला विंगच्या अध्यक्षांनी मोदींच्या घरासमोर धरणं द्यावं. त्यांना एवढंच सांगावं की हिंदूंना एकत्र येण्याचा सल्ला तुम्ही देताय, तर आधी तुमच्यापासून सुरूवात करा. पती-पत्नी एकत्र राहायला शिका’. आज काँग्रेसवाले आम्हाला सांगायला लागतेय की भाजपासमोर आपण लढलं पाहिजे. आधी लढायला तर शिका आणि मग उपदेश द्या.
हेही वाचा – बारामतीत सुप्रिया सुळे यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट, चर्चांना उधाण
भाजपा सरकार संविधान तुडवायला निघालं आहे. काँग्रेसच्या यात्रेत चातुर्वर्ण्याच्या विरोधात, समतेच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने संदेश आहे का? एक लाट उभी करण्याची संधी आली होती, ती सोडून द्यायची आणि जे मोदींविरोधात लढत आहेत, त्यांच्याविषयी शंका निर्माण करायच्या, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींच्या यात्रेलाही लक्ष्य केलं.
तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिलाय. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणं. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठलातरी राज्यपाल म्हणून जाशील. काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबहाद्दर आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.