‘मुस्लिम समाज भाजपला मतदान देणार नाही, तर गावागावात गोध्रा होईल’; प्रकाश आंबेडकर
गोध्रा दंगलीबाबत मी भाजावाल्यांना आव्हान दिलं होतं
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक मुद्यावर राजकारणाला सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते बुलढाण्याच्या एका सभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला १०० टक्के माहिती आहे की मुसलमान कमळाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की मी आत्ता मतदान केलं, तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसलेली आहे.
३० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतरच्या दंगलींबाबत प्रकाश आंबेडकरांनी गंभीर दावा केला आहे. ते म्हणाले की, गोध्रा दंगलीबाबत मी भाजावाल्यांना आव्हान दिलं होतं की माझ्याबरोबर बसा. खुले आम. याचं कारण त्या रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. नाही असं नाही. पण तो बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा. पेट्रोल टाका, डिझेल टाका, काहीही टाका. तो बाहेरून पेटत नाही. तसाच्या तसा राहतो. काय पेंट केलाय कुणाला माहिती. तो पेटतच नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो.
आतून पेटवला म्हणजे जो कुणी आत बसला आहे त्यानेच पेटला असेल. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र झालं आहे, असं गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.