प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींचा हिटलर असा उल्लेख; म्हणाले..
सातारा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल आहे. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले, ते सगळे करण्याची शक्यता आहे, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते सातारा येथे एका सभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकावी, यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले तेच करणार आहेत. जो विरोधात जाईल त्याचा आवाज दाबला जाईल. देशातील पाच हिंदू मंदिरांवर कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ही मंदिरे मिलिटरीच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी मी केली. तेथे बॉम्ब फोडून हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो बॉम्ब नि:शस्त्र केला.
हेही वाचा – शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करताय? या गोष्टींची काळजी घ्या..
महाराष्ट्रात खासगीकरणाची सुरुवात झाली असून,राज्यात शिंदे फडणवीस, पवार यांच्यापेक्षा अधिक क्षमता व नैतिकता असणारी अनेक माणसे आहेत.त्यामुळे आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेही कंत्राटी पद्धतीने भरायला सुरुवात करा. नोकर भरतीत चार हजारांवर पदे भरायची असून, टीसीआय कंपनीने अर्जासाठी एक हजार घेतले आहेत. या भरतीत टीसीआयला १२० कोटींचा नफा झाला आहे. ज्यांचे अर्ज बाद होतील, त्यांचे एक हजार रुपये ही कंपनी परत देणार का, हाही प्रश्न आहे.
मुळात नोकर भरती करण्याचा अधिकार हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ही नाही. हा अधिकार लोकसेवा आयोगाला आहे. सरकारला काेणता आयोग ते ठरविण्याचा अधिकार आहे. निवडण्याचा नाही. कंत्राटी पद्धत लागू करायला कुठेही परवानगी नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. संसदेने आणि विधानसभेने मंजूर केल्यानंतरच खर्च करण्याचा अधिकार येतो. कंत्राटी पद्धत बेकायदेशीरच आहे. हे सरकार पूर्णपणे बेकायदा सरकार आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.