ताज्या घडामोडीमुंबई
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील वीज पुरवठा खंडित
ठाणे | डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. हा वीज पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सध्या वीज नसल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडघा येथील महापारेषणच्या ४०० KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल २२० KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.
दरम्यान, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.