महायुतीमध्ये आम्ही नाराज, महाविकास आघाडीची ऑफर; रामदास आठवलेंचं विधान चर्चेत
मुंबई | लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटप अद्यापपर्यंत पूर्णपणे झाले नाही. त्यामध्ये मित्र पक्षाच्या नाराजीलादेखील सामोरे जावे लागत आहे. यातच केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये नाराज असल्याचं म्हटलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही. लोकसभेच्या दोन जागा आम्ही मागितल्या आहेत, मात्र साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही नाराज आहोत. पुढील दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेऊ.
हेही वाचा – नागरिकांनो काळजी घ्या! राज्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार
राज्य सरकरच्या शासकीय कार्यक्रमात माझा फोटो कुठेही लावला जात नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही. आंध्र, तामिळनाडू, आसाम या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. आम्ही ज्यांच्या सोबत जातो, ते सत्तेत येतात. सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. त्याठिकाणी आमचा उमेदवार तयार होता. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर केला. मला महाविकास आघाडीची ऑफर होती, पण मी नाकारली. महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्या संपर्कात होते, असं रामदास आठवले म्हणाले.
आजच्या बैठकीत आमच्या पक्षाला दोन महामंडळ, एक विधानपरिषद सदस्य, विधानसभा निवडणुकीत ४० जागा आणि लोकसभेला दोन जागा आम्हाला हव्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपद सोडल्याशिवाय राहणार नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. नवे कायदे केले, म्हणजे संविधान बदलणे होत नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.