सरकार पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

Jayant Patil : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (यांना इशारा देताना एकतर तू राहशील किंवा मी अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. यावर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, पण या मोठ्या नेत्याने असे बोलू नये, असं जयंत पाटील म्हणाले. राज्य पातळीवरच्या नेत्यांनी किंवा जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांनी या पातळीवर येऊन बोलू नये असं पाटील म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकार पडण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या सरकारचा गणपती बुडवण्याचे काम होईल
सध्या राज्यात नेत्यांच्या गाड्या फोडण्याच्या घटना समोर येत असताना हे चुकीचे चालले असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पूर्वी आम्हीही आंदोलनात नेत्यांच्या गाड्या अडवायचो, गाड्यासमोर झोपायचो आणि नंतर पोलीस आम्हाला पकडून घेऊन जायचे. पण आता या चुकीच्या प्रकारात गृहखाते अपुरे पडत असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन देताना कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते, त्यावर कोणी का बोलत नाही? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांसाठी उद्योगपती सज्जन जिंदाल यांची मोठी घोषणा!
मी ओबीसी आहे, मंडल आयोगाच्या आंदोलनात आम्ही पुढे होतो, सर्व मराठा पुढारी असताना तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी ते केले. मंत्री असताना आमच्या गाड्या जाळण्यात आल्या. आता तुम्ही छत्रपतींच्या पायाला हात लावून सांगितले की, कोणाचेही आरक्षण जाणार नाही, मग वर्षभर हा तमाशा कशाला? का तुम्ही आरक्षण दिले नाही असा सवाल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. मनोज जरांगे आरक्षणासाठी लढत असून ते काही राजकारणी नाहीत किंवा त्यांना आमदार व्हायचे नाही पण ते त्यांना दिलेल्या खोट्या आश्वासनाचा जाब विचारात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
सगेसोयरेंची मागणी अशी करता येत नसल्याचे सांगत जर आरक्षण सरसकट दिले तर प्रश्न मिटतो असे त्यांनी सांगितले. हे गुंतागुंतीचे प्रश्न मिटवण्यासाठी त्यांना 10 टक्के आरक्षण वाढवून द्यावे, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला. मीही त्यांच्या बैठकांना जात होतो, मात्र, तीच तीच चर्चा होत असल्याने मीही त्या बैठकांना जाणे बंद केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकार पडण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या सरकारचा गणपती बुडवण्याचे काम होईल असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला. आपल्याला दोन दिवसापूर्वी शरद पवार यांचा फोन आला होता. यावेळी त्यांनी केंद्रातील सरकार पडणार असल्याचे सांगितले अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. यावर आपण त्यांना तुम्ही सरकार पाडून या आम्ही तुमचे स्वागत करतो, असे बोलल्याचे जयंत पाटील म्हणाले.





