“मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मराठीच होईल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य

मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती केली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथही त्यांना आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढते आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारसभा सुरु होतील, दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर मराठीच होईल असं म्हटलं आहे.
मराठी व्होटबँक दुसऱ्यांची आहे भाजपाची नाही हे समजूच नका. मराठी व्होटबँक आमची आहे हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसांनी भाजपाला मतं दिली नसती तर सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार आले नसते. कुणी काहीही दावा केला तरीही भाजपाच क्रमांक १ चा पक्ष आहे. मराठी, अमराठी सगळेच आमचे मतदार आहेत. मुंबईचं मराठीपण कुणीहीही घालवू शकत नाही. कुणीही कुठूनही आलं तरीही मराठीपण कायम राहणार आहे.
हेही वाचा – ‘शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी’; राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबईत पूर्वी बाहेरुन मजूर यायचे, आता या शहरात वेगवेगळे लोक येतात. पण मुंबईचं मुंबई पण कुणीही घालवू शकत नाही. मुंबईच्या गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. त्यामुळे मुंबईची संस्कृती ही टिकवायची आहेच. मुंबईची संस्कृती आणि तिची वाटचाल इकडे तिकडे जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“मी १०० टक्के ठाकरे बंधूंच्या युतीचं क्रेडिट घ्यायला तयार आहे. बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती पण ते करु शकले नाहीत. ते मी जर करु शकलो तर मराठी माणसाला एकत्रित आणायचं काम मी केलं आहे. पण आता या युतीला खूप उशीर झाला आहे. दोघांची मतं संपल्यावर हे दोघं एकत्र आले आहेत. २००९ मध्ये एकत्र आले असते तर वेगळा रिझल्ट आला असता. आता एकत्रित येऊन काही फायदा नाही. दोघांची मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की मराठी माणूस आणि अमराठी माणूस यांना मतं देणार नाही. हे दोन भाऊ एकत्र आल्याची आम्हाला काहीही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे निवडणून येऊ. या दोघांचं प्राबल्य एकाच ठिकाणी आहे. तिथे आमची मतं हलली नाही. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात अडचणी तयार झालेल्या आहेत.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.





