स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय…

memorial of Sambhaji Maharaj : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन समाधीस्थळाच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, के.ई.एम. रुग्णालयाच्या वढू बुद्रुक येथील गट क्रमांक 447 आणि 448 मधील एकूण 0.87 हेक्टर 20 आर जमीन छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाच्या विकासकामांसाठी तात्काळ हस्तांतरित केली जाणार आहे.
या बदल्यात, शासनाने के.ई.एम. रुग्णालयाला कोंढापुरी (ता. शिरूर) येथील गट क्रमांक 655 मधील 0.81 आर जमीन ‘भोगवटादार वर्ग-2’ म्हणून कब्जा हक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. ही जमीन ‘विशेष बाब’ म्हणून महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित देण्यात आली असून, तिचा वापर केवळ मंजूर वैद्यकीय प्रयोजनासाठीच करावा लागणार आहे. तसेच, तीन वर्षांच्या आत त्या ठिकाणी काम सुरू करणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेण्याचे जाहीर केले होते. या दोन्ही ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 532.51 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी’; राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा, ही अनेक वर्षांची मागणी होती. या निर्णयामुळे नियोजित विकास आराखड्याला मोठी गती मिळणार आहे. हे समाधीस्थळ त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे.”
विकास आराखड्यानुसार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडणारे अत्याधुनिक संग्रहालय आणि ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध ग्रंथालय उभारले जाणार आहे. तसेच 82 आसन क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह असणार असून, त्याठिकाणी 10-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखवली जाणार आहे. स्मारक परिसरात वैशिष्ट्यपूर्ण ‘अदृश्य शिल्प’ उभारण्यात येणार असून, भीमा नदीच्या काठी 120 मीटर लांबीचा घाट बांधण्याचाही समावेश या विकासकामांत आहे.




