अतिवृष्टीचे संकट: स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी वाचवले २०० हून अधिक जीव!
पिंपरी-चिंचवडमध्ये 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम'मधील मुलांचे केले सुरक्षित स्थलांतर
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे थेरगाव आणि चिंचवड परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. अशा कठीण परिस्थितीत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून युद्धपातळीवर बचाव कार्य हाती घेतले आहे.
’पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांची सुरक्षित सुटका
चिंचवडगाव परिसरातील भागात पाणी वेगाने वाढल्याने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ मधील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सभापती अभिषेक बारणे यांनी तातडीने धाव घेतली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याशी चर्चा करून आणि आपल्या यंत्रणेला सोबत घेऊन, त्यांनी गुरुकुलममधील सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. सभापतींच्या या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.
२०० हून अधिक गायींचे प्राण वाचवले
केवळ मानवी जीवच नव्हे, तर मुक्या जनावरांच्या सुरक्षेसाठीही त्यांनी मोठी कामगिरी बजावली. गुरुकुलमधील गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने २०० हून अधिक गायी अडकून पडल्या होत्या. अभिषेक बारणे यांनी स्वतः या बचाव कार्यात पुढाकार घेत या सर्व गायींना सुरक्षित स्थानी हलवले. त्यांच्या या धाडसी कार्याचे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनीही कौतुक केले असून, संकटकाळात प्रशासकीय प्रतिनिधीने दाखवलेली ही संवेदनशीलता दिलासादायक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रशासन ‘हाय-अलर्ट’वर
चिंचवड गाव आणि थेरगाव परिसरातील पावसाची स्थिती पाहता, सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना ‘हाय-अलर्ट’वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून, “नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
अभिषेक बारणे यांच्या या कार्यतत्परतेमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, संकटकाळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





