खासदार श्रीरंग बारणेंचं अजित पवार यांना आव्हान; म्हणाले, मावळमध्ये पुन्हा एकदा..

पिंपरी : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. अजित पवार यांनी मावळमध्ये पुन्हा एकदा ताकद लावून पाहावी, मावळमध्ये मीच जिंकणार असा विश्वास मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.
श्रीरंग बारणे म्हणाले की, मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा मी २ लाख ५३ हजार मतांनी पराभव केला आहे. २०१४ असेल २०१९ असेल मी समोर कोण आहे हे बघितलं नाही. २०२४ च्या निवडणुकीतही मी मावळ मतदारसंघातून विजयी होईन. समोर कोण आहे याची मला चिंता नाही. मी जनतेतून काम करून मावळ मतदारसंघात वेगळा ठसा निर्माण केला असल्याचं बारणे म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट कायम, महापालिका घेणार ‘हा’ निर्णय
उद्धव ठाकरे हे चांगला माणूस आहेत. पण संजय राऊतांनी त्यांचे राजकारण संपवलं आहे. उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. राजकारणाला न शोभणारी व्यक्ती संजय राऊत करत आहे. हिंदुत्वाचा खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अतिशय प्रभावीपणे राज्यात काम करत आहेत, असं श्रीरंग बारणे म्हणाले.
देशभरात सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा केंद्रात भाजपचे एनडीएचं सरकार येणार आहे. पुन्हा मोदी पंतप्रधान होणार आहेत. हे सगळे पक्ष एकत्र आले तरी त्यांचा विचार जुळत नाही. ते प्रत्येताचे काम ओढण्याचे काम करत आहेत. २०२४ च्या निवडणुकीत आणखी बरीच स्थित्यंतरी होतील. पण या देशातील जनता विकासाला महत्व देईल, असं श्रीरंग बारणे म्हणाले.





