पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट कायम, महापालिका घेणार ‘हा’ निर्णय
पिंपरी : गेल्या तीन वर्षापासून पाणी पुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. पवना धरणातील पाणीसाठा १८.७६ टक्यांवर आला असून ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी कपात करण्यात येणार असल्याचं पाणीपुरवठा विभागाने म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मावळमधील पवना आणि आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्दीकरण केंद्रातून ५० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून २० असे एकूण ५८० दशलक्ष लिटर पाणी उचलते.
हेही वाचा – येरवड्यातील कैद्यांना स्मार्ट कार्ड फोनद्वारे साधता येणार संवाद
पिंपरी-चिंचवडसह मवाळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्त्रोत पवना धरण आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात २ हजार ७७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावेळी धरण तीन वेळा शंभर टक्के भरले होते. त्यामुळे हा पाणीसाठी जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. मात्र धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला चिंता सतावू लागली आहे. पावसाचा अजून पत्ता नाही. त्यामुळे ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास जुलैमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तूर्तास पाणी कपातीचा विचार नाही, असं पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी म्हटलं आहे.