‘अजित पवार यांनी बोललेल्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या’; शरद पवारांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील घरावर ईडीने का कारवाई केली, असा टोला शरद पवारांनी लगावला.
शरद पवार म्हणाले, अजित पवार जे काही बोलले त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदा समजले. त्यांच्या बोलण्यात काही स्फोट होता का, वाव होता का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. माझ्याकडून कधीच बोलावलं गेलं नाही. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सहकाऱ्याला कुठल्याही प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवायचा अधिकार होता. आमचे अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे होते. ज्या संबंधीच्या मागण्या माझ्या त्या संदर्भात चर्चा झाल्या नाहीत. तो ज्या राजकीय पक्षासोबत जाण्याचा विचार करत होते तो विचार आम्हाला मान्य नव्हता.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले..
आमचे विचार भाजपाच्या विचारांशी सुसंगत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही लोकांकडे मते मागितली तेव्हा ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. एवढंच नाही, भाजप आणि तत्सम प्रमुख पक्ष यांच्याविरोधात होती. भाजपसोबत जाणं योग्य नाही, ज्या लोकांनी आपले विचार मान्य केले आहेत त्यांची ती फसवणूक आहे. त्यामुळे तसं करणं योग्य नाही, अशी भूमिका माझ्यासह पक्षातील इतर काही सदस्यांची होती, असं शरद पवार म्हणाले.
मी राजीनामा देतो याचं कारण काय? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयानंतर काही वेगळं करण्याचं कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की, भाजपसोबत जायला नको, असंही शरद पवार म्हणाले.





