राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची प्रतिक्रिया, म्हणाले..

नवी दिल्ली | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरली चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या भाषणात हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावरून शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठं विधान केलं आहे. राहुल गांधींचं पूर्ण भाषण आपण ऐकलं असून त्यात ते काहीही चुकीचं बोलले नसल्याची भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले.
आम्हाला जेव्हा कुणी सांगतं की कावळ्यानं कान चावला, तेव्हा आम्ही आधी कानाला हात लावून तपासतो की कान व्यवस्थित आहे की नाही. जर कान व्यवस्थित नसेल, तर आम्ही कावळ्याच्या मागे लागतो. राहुल गांधींनी हिंदू धर्मविरोधी वक्तव्य केल्याचं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं, तेव्हा आम्ही राहुल गांधींनी संसदेत दिलेलं संपूर्ण भाषण ऐकलं. आम्ही त्यात पाहिलं की हिंदू धर्माविषयी ते काहीही चुकीचं बोलत नाहीयेत. ते तर म्हणतायत की हिंदू धर्मात हिंसेला जागाच नाहीये.
हेही वाचा – किल्ले रायगडावर तुफान पाऊस, आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
https://x.com/INCIndia/status/
जर राहुल गांधी म्हणत असतील की हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, तर मग त्यांच्यावर हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केलंय असा आरोप करणं, त्यांच्या भाषणातला निवडक भाग काढून त्याचा प्रसार करणं हा गुन्हा आहे असं आम्हाला वाटतं. हा अपप्रचार आहे. असं करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. मग ते माध्यम प्रतिनिधी का असेनात. हे चुकीचं आहे.
एखाद्या व्यक्तीने जी गोष्ट म्हटलेलीच नाही त्यासाठी त्या व्यक्तीला विरोध करणं, त्याला दोषी मानणं चुकीचं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हिंदू हिंसा करू शकत नाही. त्यानंतर जे लोक समोरच्या बाजूला सरकारी पक्षात बसलेत, त्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणता आणि हिंसा म्हणत द्वेष पसरवता. त्यामुळे त्यांचं म्हणणं विशिष्ट पक्षासाठी आहे. त्याच्या आधीच्या वक्तव्यात ते हिंदू धर्माविषयी बोलले. आम्ही त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्यात आम्हाला काहीही चुकीचं वाटलं नाही, असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नमूद केलं.





