रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीयांचा मृत्यू; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धात सहभागी झालेल्या १० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. मृतांपैकी बहुतेक जण रशियन सैन्यात स्वेच्छेने करार करून सहभागी झाले होते, असेही सरकारने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती विपुल पांचोली आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर २६ भारतीयांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या याचिकेत नोकरीच्या आमिषाने रशियात नेऊन संबंधित नागरिकांची फसवणूक करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने युद्धात ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा
जिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावा
परराष्ट्र मंत्रालय कुटुंबीयांच्या संपर्कात
केंद्र सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, याचिकेत नमूद २६ जणांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून परिस्थिती हाताळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने असेही सूचित केले की, काही प्रकरणांमध्ये एजंट्सनी नागरिकांची दिशाभूल केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मंत्रालयाकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप केला. यावर सरन्यायाधीशांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवले. युद्ध सुरू असलेल्या भागातून मृतदेह परत आणणे अत्यंत कठीण असू शकते, असेही न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणात आतापर्यंत उचललेल्या पावलांबाबत सविस्तर स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले.





