‘लोकसभेत रस पिळून काढला म्हणून विधानसभेत रस नाही’; संजय राऊत यांचा अजित पवारांना टोला

मुंबई | मी ७-८ वेळा निवडणूक लढलो, त्यामुळे मला आता निवडणूक लढण्यात रस राहिला नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत खोचक टीका केली आहे. तसेच, अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेवरही भाष्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्य असं आहे की, महाराष्ट्राने लोकसभेत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केला. या नंतर आम्ही आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. आज महाविकास आघाडीचा सयुक्त मेळावा मुंबईत पार पडत आहे. या मेळाव्याला तीनही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ महाविकास आघाडी फोडणार आहे. आमच्यामध्ये जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणायचं आहे. या महाराष्ट्रात दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे, या सरकारला हटवायचं आहे.
हेही वाचा – सोसायटीधारकांच्या न्यायहक्कांसाठी प्रशासनाचा ‘संवाद’
महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवत राज्यातील दरोडेखोरांचं हे सरकार आम्ही हटवणार आहोत. त्यांच्याकडे आमदार आणि खासदार खरेदी करण्यासाठी शंभर-शंभर कोटी कोठून आले? हे पैसे तुमच्या साताऱ्यामधील शेतीत पिकले का? यांचं संपूर्ण राजकारण हे हप्तेबाजीचे राहिले आहे. ते महाराष्ट्रातून हप्ते जमा करून दिल्लीत देत आहेत. राज्यामधून हप्ते जमा करून दिल्लीत द्यायचे आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं, असं त्यांचं काम सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जे-जे पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांचा आम्ही निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. मी जेव्हा जेव्हा शरद पवार यांच्याशी चर्चा केली तसेच जेव्हा जेव्हा मी शरद पवार यांचे विधान ऐकले आहेत. त्यांचंही हेच म्हणणं आहे की, अजित पवार सोडून बाकीच्या सर्वांना ते परत घेऊ शकतात. मात्र, अजित पवारांना नाही. अजित पवारांना बारामतीत आता रस राहिला नाही. कारण बारामतीमधील लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा रस पिळून काढला आहे. त्यामुळे ते आता त्यांच्या पुतण्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी ते त्यांच्या घरातील व्यक्तीच्या विरोधातच लढतील, असंही संजय राऊत म्हणाले.