‘जयकुमार गोरेंसारखे विकृत मंत्री राज्यमंत्रिमंडळात’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | राज्यात एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दुसरीकडे विविध मंत्र्यांवरील आरोप समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (४ मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी आज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिला विनयभंग प्रकरणी मोठा आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की स्वारगेटपद्धतीचं प्रकरण समोर येत आहे. स्वारगेटमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढल्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसतेय. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. हे सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत.
हेही वाचा : शिक्षण विश्व: निवेदन-सूत्रसंचालन कार्यशाळा उत्साहात
जयकुमार गोरेंसारखे विकृत मंत्री राज्यमंत्रिमंडळात आहेत. समोर काही पुरावे आले आहेत. याप्रश्न विधानसभेत आवाज उठवावा लागेल. अशा मंत्र्यांना लाथ मारली पाहिजे. महिलांचा विनयभंग करणारे हे मंत्री आहेत. हे मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महिला अत्याचाराविरोधात बोलणार आहेत, हा प्रश्न आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंची प्रकृती उत्तम आहे. ते काल चुरुचुरू बोलत होते. त्यांना दोन मिनिटंही बोलत होते, असं मी ऐकलं होतं. मलाही त्यांची दया आली होती. पण काल ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता, त्यांनी जे ट्वीट केलं, राजीनाम्याचं पत्र तयार केलं, त्यानुसार त्यांना बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाचा धक्का बसलाय असं दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या नाहीतर लाथ घालतो हे सांगितल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे, असं मला वाटतं, असंही संजय राऊत म्हणाले.