‘अजितदादा, आता शरद पवार यांच्या सर्व संस्थांमधूनही बाहेर पडा’; संजय राऊत

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांना सोबत घेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजितदादा, आता शरद पवार यांच्या सर्व संस्थांमधूनही बाहेर पडा, असं संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोकमधून हे भाष्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटी राजकीय नाहीत. शरद पवार यांनी अनेक संस्था निर्माण केले आहे. या संस्थांचं जाळं पसरलं आहे. अजित पवार यांना अजितदादांनी या संस्थांमध्ये घेतलं आहे. राज्यातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थांच्या चेअरमनपदी शरद पवार आणि संचालकपदी अजित पवार आहेत. असे अनेक त्रांगडे अनेक संस्थात आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. या वेलूवर जे लटकत आहेत. त्यांनी त्यांची पदे सोडून स्वत:च्या संस्था निर्माण करण्याचं औदार्य दाखवलं पाहिजे, असं सांगतानाच शेवटी हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीवरच अजितदादा दावा सांगता आहे. पवारांच्या हयातीतच स्वामित्व सांगितलं गेलं आहे, तिथे या संस्थांच्या हक्कांवर काय बोलायचे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा – खाद्यतेल उत्पादनात भारत होणार ‘आत्मनिर्भर’, कृषी मंत्रालयाची माहिती
राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार हे चित्र चुकीचं आहे. एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. तसेच अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी होऊ शकत नाही, असा दावाही राऊत यांनी केला आहे. ईडीच्या धाकाने अनेकजण भाजपमध्ये गेले आहेत. काही शिंदे यांच्या गटाच्या आश्रयाला गेले आहेत. पण २०२४ च्या सत्ताबदलानंतर अनेकजण परत फिरतील. मोदी सरकार जात असल्याची झुळूक जरी लागली तरी भाजपचा तंबू रिकामा होईल, असं संजय राऊत म्हणाले.
मोदींचे समर्थन करणं म्हणजे प्रतिगामी शक्तींचे समर्थन करण्यासारखे आहे. त्यामुळे जे आज भाजपमध्ये गेले. उद्या त्यांचे हळूहळू राजकारण संपणार आहे. अजित पवारांबरोबर भाजपच्या कळपात जाण्याची चूक शरद पवार करणार नाहीत. पण शेवटी हा व्यक्तीचा विषय आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील नेत्यांना गोलगोल, गोलमाल राजकारण करता येणार नाही. अजित पवार हे काकांच्या जिवावर मोठे झाले आणइ काकांचे राजकारण त्यांनी संकटात आणले. ते गोलमाल राजकारण करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. दुसरीकडे भाजप आमदारांना आता एकनाथ शिंदे हे ओझे वाटू लागले आहेत. शिंदे यांच्यामुळे भाजपचं राज्यात मोठं नुकसान झालं आहे, असं भाजप नेते अमित शाह यांना सांगत आहे. शाहही राज्यात बदल करणार असल्याचं सांगत आहे. तर २०२४ नंतरही आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. अमित शाह यांनी वचन दिल्याचा दावाही शिंदे करत आहेत. पण ते काही खरे नाही. शाह यांना शिंदे यांना दिलेलं वचन पाळायचं होतं तर अजितदादांचा घोडा रिंगणात आलाच नसता. राज्यातील राजकारण हेलकावे खात आहे, त्या अस्थिरतेचा फायदा दिल्लीला घ्यायचा आहे, असं दावाही संजय राऊत यांनी केला आहे.





