पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘सारथी’ प्रणाली होणार अधिक सक्षम
महापौरांचे कडक निर्देश : नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि समाधानकारक निवारण व्हावे

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ‘सारथी’ डिजिटल नागरिक सेवा प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि समाधानकारक निवारण व्हावे, यासाठी ‘सारथी 2.0’ विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात ‘सारथी’ प्रणाली केवळ तक्रार नोंदणीपुरती मर्यादित न राहता ती ‘स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म’ म्हणून विकसित करण्यावर भर दिला आहे. सध्या तक्रारींचे विभागनिहाय विलंबाने वर्गीकरण, ‘Resolved’ स्थिती आणि प्रत्यक्ष कामामधील विसंगती, डेटा विश्लेषणाचा अभाव तसेच मोबाईल अॅपच्या UI/UX मधील त्रुटी यांसारख्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा – पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशनची मागणी
सुधारणा उपायांवर भर
प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी महापौरांनी पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत:
* तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून संबंधित विभागाकडे त्वरित पाठविणे
* ‘Resolved’ स्थितीपूर्वी प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य करणे
* तक्रारींवर मूळ कारण विश्लेषण (RCA) करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे
* विभागनिहाय अधिकाऱ्यांची माहिती प्रणालीत समाविष्ट करणे
* नागरिकांसाठी सुलभ व प्रभावी UI/UX सुधारणा
* सर्व सेवांसाठी स्पष्ट Service Level Agreement (SLA) निश्चित करणे
* डेटा सुरक्षा व Disaster Recovery प्रणाली मजबूत करणे
* ‘सारथी 2.0’मध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर
‘Updated Smart Sarathi Platform’ अंतर्गत AI आधारित तक्रार वर्गीकरण, Predictive Analytics आणि Chatbot सुविधा समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी ३० दिवसांत कृती आराखडा आणि ६० दिवसांत सुधारित प्रणालीचा रोडमॅप सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
डिजिटल सुशासनाकडे पुढचे पाऊल
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “सारथी ही केवळ तक्रार नोंदणी प्रणाली नसून ती नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचे दुवा आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलद, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” ‘सारथी 2.0’च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका डिजिटल सुशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असून, नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.





