“मीच खरा वाघ”; रावसाहेब दानवेंचं ‘दानव’ टोल्याला प्रत्युत्तर!

Raosaheb Danve | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) व मनसेत युती झाली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काल युती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी “उत्तरं देवाला दिली जातात, दानवांना नाही”, असा टोला लगावला होता. आता भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, दोन्ही बंधु एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असं वागावं. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली. भाजपाला सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. त्यांचं अडीच वर्षांचं सरकार या राज्यातल्या लोकांना आवडलं नाही. सत्तांतर झालं. त्यांचा एक-एक शिलेदार त्यांना सोडून गेला. एकीकडे त्यांच्या युतीची पत्रकार परिषद सुरू होती, दुसरीकडे कार्यकर्ते त्यांना सोडून चालले होते.
हेही वाचा : १९ वर्षांनंतर ‘कुरळे ब्रदर्स’चे पुनरागमन; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची तारीख जाहीर
भाजपाने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री व राज्यात पक्षाचा अध्यक्ष केलं. मला जर कोणी पक्षात विचारत नसतं तर असं केलं असतं का? माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार आहे. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून, शेपुट खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे. त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. डरकाळ्या मारत मी विधानसभेत अन् लोकसभेतही गेलो. मी म्हणालो हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाहीत, कारण प्रचारासाठी फिरताना मला ते समजत होतं. आता जर ते हरले तर कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर राहून काही अस्तित्वच राहणार नाही. म्हणून सगळे कार्यकर्ते त्यांना सोडून जातील. दोन्ही भावांवर एकदाच टीका नको. त्यांचं एकदा होऊन जाऊ द्या, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची काल पत्रकार परिषद झाली. दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा ठाकरे बंधुंनी केली. एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला, ही उद्धव ठाकरे यांची शेवटची निवडणूक आहे. यानंतर त्यांच्या पक्षात कार्यकर्तेच राहणार नाही, असं लोक म्हणत आहेत. त्यावर राज ठाकरे म्हणाले, लोक म्हणजे कोण? त्यावर पत्रकाराने भाजपा नेते रावसाहेब दानवेंचे नाव घेतले. त्यावेळी राज ठाकरे हे उद्धव यांच्या मदतीला धावून आले व म्हणाले, मला असं वाटतं उत्तरं देवाला द्यावीत, दानवांना नाही.





