‘देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही’; रामदास आठवले महायुतीवर नाराज

Ramdas Athawale | महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. १६ डिसेंबर म्हणजेच आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होतं आहे. त्याआधी नागपूरमध्ये ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र यामध्ये महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. यावरून रामदास आठवले यांनी महायुतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
रामदास आठवले म्हणाले, की महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण देखील आलं नाही. मग जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपाबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही.
हेही वाचा – महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार : शपथ घेतलेल्या मंत्र्याची यादी वाचा!
आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, त्यांनी आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. तसेच गेल्या अडीच वर्षांच्या सरकामध्येही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. मला वाटतं की राज्यातील गावागावत आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता त्यांना कसं तोंड द्यायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
केंद्रात मला एक मंत्रिपद मिळालं. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत भागेदारी मिळाली पाहिजे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की यावेळी संधी दिली जाईल. कालपर्यंत आम्ही वाट पाहिली. पण आमच्या आरपीआयचा मंत्री करण्यासंदर्भात आम्हाला कोणता फोन आला नाही. त्यामुळे मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे. भाजपाने रिपब्लिकन पार्टीकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. याबाबत आमची नाराजी आहे. आमची मागणी आहे की आता जे दोन मंत्रिपदे राहिले आहेत, त्यासाठी तरी रिपब्लिकन पार्टीचा विचार केला पाहिजे. पण आमच्या पक्षाला का टाळलं जातं? हे समजत नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.