..तर मोहन भागवतांना अटक झाली असती; राहुल गांधींचं वक्तव्य

Rahul Gandhi | राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे. भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्याचा राहुल गांधींनी चांगलाच समाचार घेतला.
राहुल गांधी म्हणाले, की महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही. मोहन भागवत हे दर दोन ते तीन दिवसांनी देशाला हे सांगत असतात की स्वातंत्र्यसंग्रामाबाबत त्यांचे विचार काय आहेत. त्यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य हा देशद्रोह आहे. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ हाच होतो की संविधानाचं काही औचित्यच नाही. इंग्रजांच्या विरोधात जी लढाई देशाने केली त्याला काही अर्थ नाही.
हेही वाचा – आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी
मोहन भागवत सार्वजनिकपणे असं वक्तव्य करतात. जर दुसऱ्या एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती. तसंच त्यांच्यावर खटला भरवला गेला असता. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही असं म्हणणं हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. हा अपमान मोहन भागवत यांनी केला आहे. आता ही वेळ आली आहे की मोहन भागवत जी वायफळ बडबड करतात ती आपण ऐकणं बंद केलं पाहिजे. कारण आता लोकांना कळलं आहे की एकच एक वक्तव्य हे लोक अशाच प्रकारे बोलत राहतील आणि तेच खरं आहे असं ओरडत राहतील, असं राहुल गांधी म्हणाले.
हे दोन विचारांमधील द्वंद आहे. दोन विचारधारांममधील ही लढाई आहे. संविधान हा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे संघाचा विचार हा नेमका त्याच्या उलट आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे गांधी म्हणाले. तसंच काँग्रेस या विचारधारेला रोखू शकणारा पक्ष आहे हे लक्षात ठेवा, असं राहुल गांधी म्हणाले.





