महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात दौऱ्यांचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचं ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे.
हेही वाचा – १ सप्टेंबरपासून ‘हे’ ५ मोठे बदल होणार, सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार?
मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.





