केरळनंतर आता ‘या’ शहराचे नाव बदलणार? थेट अमित शहांकडे केली मागणी

City Name Change : केंद्र सरकारने दक्षिण भारतातील केरळ राज्याचे अधिकृत नाव ‘केरळ’ वरून ‘केरळम’ असे बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव स्वतः केरळ राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. केरळ विधानसभेने २०२४ मध्ये एकमताने हा ठराव मंजूर केला होता.
ज्यामुळे मल्याळम भाषेतील उच्चार आणि सांस्कृतिक ओळख यांच्याशी जुळणारे नाव अधिकृतपणे (City Name Change) वापरले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव संसदेत मांडला जाणार असून, राष्ट्रपतींकडून केरळ (नाव बदल) विधेयक २०२६ अंतर्गत पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
केरळ हे ‘नारळांच्या भूमी’चे प्रतीक मानले जाते आणि ‘केरळम’ हे नाव मल्याळममध्ये राज्याला संबोधित करण्यासाठी नेहमीच वापरले जाते. हा बदल केरळच्या सांस्कृतिक आणि भाषिक वारशाला अधिकृत मान्यता देणारा मानला जात आहे. मात्र, या निर्णयावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी टीका केली असून, नाव बदलण्यापेक्षा विकास प्रकल्पांवर भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – सावंतवाडी-दोडामार्गातील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चा दर्जा; खाणकामावर आता कायमची बंदी
दरम्यान, केरळच्या नाव बदलाच्या निर्णयानंतर आता आणखी एक मोठी मागणी समोर आली आहे. भाजपाचे खासदार आणि चांदणी चौक मतदारसंघाचे प्रतिनिधी प्रवीण खंडेलवाल यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे.
खंडेलवाल यांच्या पत्रानुसार, ‘दिल्ली’ हे नाव मध्ययुगीन आणि वसाहतवादी काळाशी संबंधित आहे, तर ‘इंद्रप्रस्थ’ हे महाभारत काळातील प्राचीन नाव आहे, जे पांडवांनी स्थापन केलेल्या राजधानीचे प्रतीक आहे. पुरातत्व सर्वेक्षण भारताच्या उत्खननांमधून (विशेषतः पुराणा किल्ल्याजवळ) इंद्रप्रस्थाशी संबंधित पुरावे मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नाव बदलामुळे भारताच्या प्राचीन सभ्यतेची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख अधिक मजबूत होईल, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
दिल्लीला इतिहासात विविध नावांनी ओळखले गेले आहे. दिल्लिका, दहली, तुघलकाबाद, शाहजहानाबाद, नवी दिल्ली इत्यादी. स्वातंत्र्यानंतर हे शहर ‘दिल्ली’ या नावाने ओळखले जाते. यापूर्वी भारतात अनेक शहरांचे नामकरण झाले आहे, जसे की कलकत्ता ते कोलकाता, इलाहाबाद ते प्रयागराज, मद्रास ते चेन्नई आणि बॉम्बे ते मुंबई. त्यामुळे दिल्ली शहराचे नावही भविष्यात बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




