‘माझी प्रतिमा मलिन करण्याची सुपारी दिली’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा अट्टाहास आहे. त्यांनी त्यासाठी देशात आणि देशाबाहेरच्या काहींशी संगनमत करून सुपारी दिली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांनी २०१४ पासूनच निश्चय केला आहे, ते जाहीरपणेही बोलले आहेत, त्यांनी संकल्प केला आहे की, ते मोदींची छवी खराब करूनच राहतील. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी देऊन ठेवली आहे आणि स्वतःही मोर्चा सांभाळत आहेत. या लोकांना साथ देण्यासाठी काही लोक देशात आहेत, तर काही देशाबाहेर आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशातील गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि प्रत्येक भारतीय नागरिक मोदींचे संरक्षक कवच आहेत आणि हेच विरोधकांच्या डोळ्यांत खूपच असून ते माझ्या विरोधात नवनव्या युक्त्या योजत आहेत, असे मोदी म्हणाले. या लोकांनी माझी कबर खोदण्याची शपथ घेतली असल्याचा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला. आधीची सरकारे मतपेढीच्या तृष्टीकरणात व्यग्र होती, तथापि, माझे सरकार नागरिकांना संतुष्ट करण्यात व्यग्र आहे, असंही मोदी म्हणाले.





