‘संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी’; प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई : बुधवारी लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरूणांनी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. या घटनेमुळे लोकसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी मागणी केली आहे. संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही. त्यामुळे त्या मुलांनी हे टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला. हे बरोबर आहे, मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायची हे सरकारनं ठरवलं पाहिजे.
हेही वाचा – मतदान कार्डवरील फोटो बदलायचा आहे? तर ‘या’ स्टेप्स फॉलो करा..
संसदेची सुरक्षा कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिलीय? जुनी सुरक्षा व्यवस्था मजबूत होती. उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचं हे सरकारनं ठरवावं. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा इश्यू क्लोज करावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असं बच्चू कडू यांनी सभागृहात बोलताना म्हटलं होतं. यावरून ते म्हणाले, बच्चू कडू यांनी जरी ही इच्छा व्यक्त केली असली तरी शेवटी लोकशाहीत यासाठी लोकांचा आशीर्वाद आणि संख्याबळ महत्वाचं असतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.





