पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नवी दिल्ली | देशातील तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज (१५ मार्च) जाहीर होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाचे पॅनल या पत्रकार परिषदेत अधिसूचना जाहीर होण्याची तारीख, उमेदवारांसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत, नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख, मतदानाचे टप्पे आणि निकाल जाहीर होण्याची तारीख याची माहिती देणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.
हेही वाचा : “मजेसाठी पुन्हा बॉम्ब टाकू”; इराणच्या सर्वात मोठ्या तेल केंद्रावर हल्ल्याचा ट्रम्प यांचा इशारा
दरम्यान, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. तेथे तीन किंवा त्यापेक्षा अधिक टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२१ प्रमाणे सात-आठ टप्प्यांत निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही, असे मत काही राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगासमोर मांडले आहे.
सध्याच्या १७ व्या पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन विधानसभा स्थापन करण्यासाठी मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाकडे देशाचे लक्ष लागले आहे.





