‘काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा’; ओमर अब्दुल्ला यांचा सल्ला

Omar Abdullah | जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेससह त्यांच्या इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांना एक सल्ला दिला आहे. या लोकांनी (इंडिया आघाडीतील पक्ष) ईव्हीएमची तक्रार करणं थांबवायला हवं आणि निवडणुकीचा जो काही निकाल समोर आला आहे तो स्वीकारायला हवा, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते कागदी मतपत्रिका पुन्हा वापरात आणण्याची मागणी करत आहेत. याबाबत विचारले असता ओमर अब्दुल्ला म्हणाले, की याच ‘ईव्हीएम’ मशीनच्या जोरावर तुम्हाला लोकसभा निवडणुकीत शंभरपर्यंत जागा मिळाल्या. तेव्हा तुम्ही विजय मिळाल्याप्रमाणे उत्सव साजरा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी तुम्हाला लोकसभेप्रमाणे अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून तुम्ही आता ‘ईव्हीएम’ला दोष देताय. निवडणुकीचे निकाल नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच लागती असं नाही.
हेही वाचा – पुणे पुस्तक महोत्सव | मेजर ध्यानचंद पुस्तकाने गाठला विक्रमी 20 हजार विक्रीचा पल्ला
मतदान यंत्रणेवर विश्वास नसेल तर या पक्षांनी निवडणूक लढवू नये. मतदानयंत्रात समस्या असतील तर विरोधी पक्षांनी आपल्या ‘ईव्हीएम’ विरोधामध्ये सातत्य ठेवावे. नुसते आरोप करून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, हे लक्षात घ्ययला हवं. निवडणूक जिंकल्यावर मूग गिळून गप्प बसायचं आणि पराभव झाल्यावर ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचा हे चुकीचं आहे, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.





