Pahelgam Terrorist Attack | ‘दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार’; पंतप्रधान मोदींचा इशारा

PM Narendra Modi | जम्मू-काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले, तर अनेक जण जखमी झाले. या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, केंद्र सरकारने याला आक्रमकपणे प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना ओळखेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं कटकारस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे.
ते पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार आहे.”
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील दुषित पाणी पुरवठ्यावरुन प्रशासनाची ‘धुलाई’
विशेष म्हणजे, बिहारमधील हिंदी भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अचानक इंग्रजीतून बोलण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांचा संदेश जागतिक समुदायापर्यंत पोहोचेल. ते म्हणाले, बिहारच्या मातीत उभं राहून मी जगाला सांगू इच्छितो की भारत या दहशतवाद्यांची ओळख पटवेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षाही देईल. पृथ्वीच्या अंतापर्यंत आम्ही त्यांचा माग काढू. भारताचं स्पिरिट आम्ही अशा दहशतवादी कृत्यांमुळे रोखणार नाही.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, दहशतवाद्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय भारत थांबणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण राष्ट्र या संकल्पात एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. ही शिक्षा कठोर आणि महत्त्वपूर्ण असेल, ज्याचा दहशतवाद्यांनी कधी विचारही केला नसेल, असे ते म्हणाले.