उरलेले १५ आमदारही शिंदे गटात जाणार?; नारायण राणेंचं सूचक वक्तव्य

पाच पावलं चालू शकत नाहीत, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार?
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेत भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. कुणी आम्हाला देशद्रोही म्हटलं तर त्याची जीभ हासडून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून आता केंद्रीय मंत्री भाजपा नेते नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंची खेड येथील सभा पूर्वनियोजित होती. पूर्वी शिवसेनाच्या सभा जाहीर व्हायच्या. खेडला उद्धव ठाकरे येणार आहेत, असं कळाल्यावर सगळे लोक स्वत:हून सभेच्या ठिकाणी जायचे. आता तसं नाही. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून लोकांना सभेसाठी आणलं होतं. ही सभा विराट सभा होती, हे दाखवण्यासाठी सभेतील खुर्यांमध्ये दोन लोक झोपतील एवढी जागा सोडली होती. ही सभा विराट सभा नव्हती. सभेत स्थानिक लोक नव्हते, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना राज्याच्या विकासाबद्दल आणि जनतेबद्दल काहीही बोलता येत नाही. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काहीही केलं नाही. कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होते, त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यांनी कोकणाला कोणत्या नवीन योजना दिल्या? त्यांनी काहीही दिलं नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नव्हतं. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेले. त्या माणसाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार..आता शिवसेना संपली आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही त्यांच्या हाताशी राहणार नाहीत, असं सुचक वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंती ताकदच नाही. मंत्रालयात यायची त्यांची ताकद नव्हती, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार? हे शक्य आहे का? ते पाच पावलं चालू शकत नाहीत. आता त्यांचं वय नाही. वयात असतानाही ते काही करू शकले नाहीत. आक्रमक शिवसैनिकांमुळे शिवसेना घडली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची एक टक्काही वाटा नाही. त्यांनी कधी एकाला कानफटातही मारलं नाही. हा त्यांचा इतिहास आहे. आघाडी ही जनतेच्या मनातून बिघडली आहे, असंही नारायण राणे म्हणाले.





