राज्यभरात तब्बल 487 शाळा अनधिकृत; सर्वाधिक 389 शाळा मुंबईत

मुंबई: राज्यात सध्या अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून मुंबई आणि पुणे विभागात सर्वाधिक अनधिकृत शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या राज्यात तब्बल 487 अनधिकृत शाळा असून मुंबईत सर्वाधिक 389 शाळा, तर त्याखालोखाल पुण्यात 63 अनधिकृत शाळा असल्याचे उघडकीस आले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई (389), नाशिक (3), पुणे (63), कोल्हापूर (15), छत्रपती संभाजीनगर (1), लातूर (1), नागपूर (11), अमरावती (4) अशा नऊ विभागीय मंडळांत 487 शाळा अनधिकृत आहेत.
यातील 76 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई (59), पुणे (11), लातूर (1), नागपूर (4), अमरावती (1) या विभागातील शाळांचा समावेश आहे; तर 111 शाळांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई (96), पुणे (7), नागपूर (6), अमरावती (2) या विभागातील शाळा आहेत.
हेही वाचा – सोशल मीडियावर द्यावा लागणार पुरावा; राज्य सरकारचा मोठा निर्णय
तसेच 325 शाळांवर दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये मुंबई (310), पुणे (10), लातूर (1), नागपूर (4) या शाळांचा समावेश आहे. त्यातील केवळ 16 शाळांकडूनच दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई (5), पुणे (10), लातूर (1) या विभागातील शाळांचा समावेश आहे. राज्यात 487 शाळा अनधिकृ्त असताना केवळ 76 शाळा बंद केल्या आहेत, तर अवघ्या 16 शाळांकडून दंड वसूल केला आहे.
राज्यातील कोणतीही अनधिकृत शाळा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, यासाठी विभाग गंभीरपणे काम करीत आहे. अशा शाळांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून, जिल्हानिहाय तपासणी वाढविण्यात येईल. पालकांना वेळेत माहिती मिळावी यासाठी अनधिकृत शाळांची यादी वर्षातून दोनदा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
शासनाचा परवानगी आदेश, नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही शाळा सुरू करता येत नाही. तसेच अनधिकृतरीत्या शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाला एक लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यानंतरही बंद न ठेवल्यास 10 लाख रुपये प्रतिदिवस दंड ठोठावण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.





