सगळे प्रयत्न संपल्यावर लोक जनतेकडे जातात; सरसंघचालकांचा पुन्हा मोदींवर अप्रत्यक्ष निशाना

Mohan Bhagwat | ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणत्याही नेत्यास शाल दिली जाते. त्याचा अर्थ म्हणजे त्याचे आता वय झाले आहे. तुम्ही इतरांना संधी दिली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. भागवत यांच्या या वक्तव्याला विरोधकांनी हत्यार बनवले. त्यानंतर नागपूरमध्ये एका कार्यक्रम भागवत म्हणाले की, सगळे प्रयत्न संपले म्हणजे लोक सामान्य जनतेकडे जातात, हा इशाराही त्यांनी मोदींना दिल्याची चर्चा आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, की भगवान शंकरामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य आहे. मनुष्याला देवापर्यंत पोहचवण्याचे मार्ग शंकरांपासून निघाले आहेत. इतके सामर्थ्य असतानाही शिव विरागी वृत्तीचे आहेत. भौतिक जीवनाच्या भोगापासून ते कायम दूर राहिले. जगाचे भले व्हावे म्हणून त्यांनी विषही पिले. अशा प्रवृत्तीला सोडून चांगले दिवस आल्यामुळे आपल्याला काहीतरी मिळावे ही प्रवृत्ती वाढत आहे.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडीसह ३ नवीन महापालिका होणार; अजित पवारांची घोषणा
परंतु, हा शंकराचा स्वभाव नाही. ज्याच्यापासून सामान्य जणांना धोका होईल ते अंगावर घेणे हा शिवाचा स्वभाव आहे. असे जीवन जगण्याची गरज आहे. माणसाच्या हावरटपणामुळे आज संकट आहेत. त्याच्यातील कट्टरपणामुळे राग, द्वेष वाढत असून लढाया, युद्ध होत आहेत. मला मिळायला हवे, बाकीच्यांना मिळाले नाही तरी चालेल अशी स्वार्थी वृत्ती वाढत असून ही मनुष्याची काळी बाजू आहे. ही प्रवृत्ती बदलणे आवश्यक आहे. शिवाचे पूजन करणे म्हणजे ही प्रवृत्ती बदलणे होय. मला काही नको, साधेपणाने राहणे, करुणा हा भाव प्रत्येकात असणे आवश्यक आहे. आपला उपयोग जगासाठी अधिक व्हावा अशी वृत्ती म्हणजे शिववृत्ती आहे. असे पवित्र जीवन जगण्याची गरज आहे. त्यासाठी शिवाची भक्ती करायला हवी, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.
श्रावण महिन्यात सगळे शिवाची भक्ती करतात. शिव हे सामान्य जनतेचे प्रतीक आहे. सगळे प्रयत्न संपले म्हणजे लोक सामान्य जनतेकडे जातात. जनतेच्या मनात आले तर कामेही होतात. जगामध्ये परिवर्तन येत आहे असे बुद्धिवादी लोक म्हणतात. हे ओळखून मनुष्याने योग्य पावले टाकली नाही तर विनाश होईल. काळ ओळखला तर नवीन उन्नत समाज उभा राहील, असंही मोहन भागवत म्हणाले.





