भाजपने बोगस मतदार घुसवून महाराष्ट्र-दिल्लीची निवडणूक जिंकली; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

Mamata Banerjee | भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा बनावट मतदार वापरून मिळवला असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९४ पैकी २९४ जागा जिंकण्याचे ध्येय त्यांनी बोलू दाखवले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, की मी अभिषेक (पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी) यांच्याशी सहमत आहे. आपण २०२१ मध्ये जिंकल्या होत्या त्यापेक्षा किमान एक जागा जास्त जिंकली पाहिजे. आपल्याला २१५ जागा तर मिळाल्याच पाहिजेत आणि आपण त्याहून अधिक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाजपा, सीपीआयएम आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होईल किंवा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट होईल याची आपण काळजी घेऊ.
हेही वाचा : उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बूथ कार्यकर्त्यांनी तात्काळ हे काम करायला सुरुवात करावी. जिल्हाध्यक्षांनी या प्रक्रियेवर देखरेख करावी आणि सात दिवसांच्या आत याबद्दलचा अभिप्राय द्यावा. महाराष्ट्रातील पक्षांना (भाजपा सोडून) हे कसे आढळून आले नाही, दिल्लीतील पक्षांच्या हे लक्षात आले नाही. पण आमच्या हे लक्षात आले आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत विजय (भाजपाने) अशाप्रकारे मिळवला. माझ्याकडे सर्व जिल्ह्यांमधील उदाहरणे आहेत. पश्चिम बंगालमधील रहिवाशांप्रमाणेच हरियाणा आणि गुजरातमधील लोकांची नावे यामध्ये आहेत, त्यांच्या सारख्याच EPIC सह (इलेक्शन फोटो आयडेंटी कार्ड) आहेत. बनावट मतदार ऑनलाइन वाढवले जातात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मला निवडणूक आयोगाबद्दल आदर होता. पण आता असे दिसते की तो (निवडणूक आयोग) भाजपाच्या विचारांच्या लोकांनी भरलेला आहे. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (ज्ञानेश कुमार) हे यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अंतर्गत सहकार विभागात सचिव होते. आपण दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ धरणे देखील बसू शकतो हे विसरू नका, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.