“ओसाड गावाची पाटिलकी सोडतो हे म्हणणं कितपत योग्य?”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : १९ जून रोजी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडण्याबाबत एक विधान केलं होतं. माझ्यावरचे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडेन असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली आहे.
“माझ्यावर जे आरोप होत आहेत, ते खरे आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सांगायचं मी आत्ता या पदावरुन पायउतार व्हायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे, की सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोराच्या हाती जाऊ द्यायची नाही.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
हेही वाचा – बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, काय मागण्या मान्य झाल्या ते पाहा ..
पहिल्यांदा तर ओसाड गावाची पाटिलकी सोडतो असं म्हणणं कितपत योग्य आहे? हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेना म्हणजे काय आहे? शिवसेना पक्ष नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. तो संपत्तीचा वारसा नाही तर विचारांचा वारसा आहे. विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य नव्हते ते सगळे वेगळे झाले. त्या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवसेना ही जिवंत ठेवली आणि आज आपण बघतो आहे की सातत्याने हा विचार मांडणारे जे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एकत्र येत आहेत. ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची करण्याची आवश्यकता होती त्यावेळी माननीय उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं नाही. हा त्याचा परिणाम आहे. आज आता कुणाच्याही मनात ही शंका उरलेली नाही की बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे चालवत आहेत ती शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे, त्यांच्या जवळ आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचारच ते पुढे नेत आहेत.
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर एका वाक्यात प्रतिक्रिया देत भाष्य केलं. “ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे”, असं मिश्किलपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना जे सांगायचं आहे ते. आज हे म्हणायची वेळ का आली? कुणी राहिलंच नाही तर राजीनामा देणार नाहीतर काय करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.





