‘शिवसेना फुटायला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी फुटायला शरद पवार जबाबदार’; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

मुंबई | भाजपामुळे आज महाराष्ट्रात सहा पक्ष तयार झाले आहेत का? या प्रश्नाचे उच्चर देताना देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिवसेना फुटायला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी फुटायला शरद पवार जबाबदार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक काळ असा होता की काँग्रेसचे लोक म्हणायचे यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, आत्ताही काही प्रमाणात हे बोललं जातं. मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. आपल्या मुलाला, मुलीला पक्षाचा वारसा द्यायचा आहे या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला.
हेही वाचा – मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून जनजागृतीसाठी सूचना
शरद पवारांचा पक्ष आम्ही फोडू शकतो का? ज्यांनी आयुष्यभर लोकांचे पक्ष फोडले त्यांचा पक्ष भाजपा कशी काय फोडू शकते? शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला. कारण नैसर्गिकदृष्ट्या त्यांचा वारसा त्यांनी इतक्या वर्षांपासून अजित पवारांकडे दिला होता. आता त्यांना वाटलं की सुप्रिया सुळेंकडे वारसा असला पाहिजे. राजकारणात घराणेशाही असलेले पक्ष असतात त्यांची अवस्था अशीच होते. अजित पवारांना जेव्हा वाटलं की आता माझं राजकारणच संपेल त्यावेळी ते आमच्याबरोबर आले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनेत एकनाथ शिंदेंना जेव्हा हे जाणवलं की ज्या काही तडजोडी चालल्या आहेत त्या सगळ्या आदित्य ठाकरेंसाठी चालल्या आहेत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनाच पक्ष सोपवायचा आहे. एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढलं होतं ते कमी करुन आदित्य ठाकरेंकडे पक्ष सोपवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शिवसेना फुटली. शिवसेना मोठी झाली हिंदुत्वामुळे, हिंदुत्व सोडल्यानंतर लोकांकडे जाऊन मतं मागायची कशी? हा प्रश्न एकनाथ शिंदेंना पडला होता. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले आणि शिवसेना फुटली. आम्ही राजकारणात भजन करायला आलो नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले तेव्हा आम्ही सरकार स्थापन केलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.





