घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं? देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना टोला

पुणे | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत आल्यास नागरिकांना मोफत बस आणि मेट्रो प्रवास सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट आणि खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी दिलेले हे मोफतचे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही हे पुणेकरांना माहिती आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत अजित पवार यांच्या मेट्रो तिकीट मोफत करण्याबाबतच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, खरंतर मी आज घोषणा करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमानं आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. घोषणा करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं घोषणा करायला? असा टोला फडणवीसांनी अजितदादांना लगावला.
हेही वाचा : वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकिटांची किंमत वाढली, आरक्षण प्रणालीतही बदल
अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक निवडणुका जिंकण्याच्या डेस्पिरेशनमध्ये, जेव्हा आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही. अशा स्थितीत आम्ही काहीही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काहीह म्हणतो. तरीही माझं म्हणणं आहे की किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हणल्या पाहिजे. ज्या आपण करू शकू, असं फडणवीस म्हणाले.
मेट्रोचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन खरेच पूर्ण करणे शक्य आहे का? याबाबतही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टिकरण दिले. ते म्हणाले की, मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाहीये. मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोच्या बॉडीचे अध्यक्ष हे केंद्रिय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्राचे असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोचे आपण फेअर फिक्सेशन करतो, त्यावेळी कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीलाच कायद्याने दिलेले अधिकार आहेत. उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं, तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे. ऑपरेशनल खर्चतरी निघाला पाहिजे. समाजा जर हा खर्च तुम्ही काढणार नसाल आणि सवलत द्याची असेल तर तुम्ही कुठून पैसे देणार हे सांगा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.





