नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी
तातडीने कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांची दखल घेत नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचणे, अंतर्गत गटारे तुंबणे, ड्रेनेज लाईनची समस्या, नाल्यांमधील अडथळे, स्वच्छतेचा प्रश्न तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व समस्यांची डॉ. कांबळे यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करत प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील नरोटे, उपअभियंता बाळासाहेब शेटे, सहकारी रिंकू पिटेकर, विठ्ठल शिंदे तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी परिसरातील विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून प्रलंबित कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची भूमिका मांडली.
हेही वाचा – “भाजपमध्ये ‘हा’ पक्ष विलीन होणार” ; राजकारणात एकच खळबळ

पाहणीदरम्यान अंतर्गत गटारे, ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, नाल्यांची स्थिती तसेच ज्या भागात सातत्याने पावसाचे पाणी साचते अशा ठिकाणांची सविस्तर पाहणी करण्यात आली. या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचे निर्देश डॉ. कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी कार्यकारी अभियंता सुनील नरोटे यांनी बालाजीनगर परिसरातील प्रलंबित नागरी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कोणतीही समस्या प्रलंबित राहू देणार नाही. सुदैवाने पावसाने आता उघडीप घेतली असल्याने पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि मूलभूत सुविधांनी युक्त परिसर उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राधान्य आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, शहर सुधारणा समिती सदस्य, पिं. चिं. मनपा.





