‘काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण केलं काही नाही’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वयंपूर्ण विकास प्रकल्पांसाठी तीन वर्षांसाठीची व्याजमाफी जाहीर केली. मध्यमवर्गीयांना आणि मराठी माणसांनना हक्काचं घर मिळण्यासाठी याचा उपयोग होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की केंद्रीय मंत्री असताना वेळ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण पियूष गोयल हे वेळ काढतात आणि मुंबईच्या प्रश्नांमध्ये रस घेतात. पियूषजी मी तुम्हाला सांगतो आमच्या मुंबईतल्या ज्या समस्या आहेत त्यातल्या अर्ध्या समस्यांमधून तर तुम्हीच आम्हाला बाहेर काढू शकतात. केंद्र सरकारमध्ये आमचे अँबेसेडर म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. मला माहीत आहे की आपल्या मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा विडा हा पियूष गोयल यांनी उचलला आहे. आमचं संपूर्ण सहकार्य तुम्हाला असेल.
हेही वाचा : Supreme Court Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर!
गेल्या पंचवीस तीस वर्षात मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईतला मध्यमवर्गीय याला त्याच्या जीवनामध्ये येणं तर सोडाच पण त्याला सातत्याने मुंबईच्या बाहेर जाण्याची वेळ आली. आपण जर मुंबई शहराचा परिस बघितला तर हा शहरातला माणूस मोठ्या प्रमाणात कुठेतरी बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. काही लोक फक्त मराठी माणसांचे नाव घेत असतात, पण त्यांनी काही ठोस केले नाही. आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आम्ही त्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर हे या ठिकाणी देऊ शकलो आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
दुर्दैवाने २०१९ नंतर काही काळ आपलं सरकार नव्हतं. त्यावेळी या स्वयंपूर्ण विकासाला ब्रेक लागला होता. मात्र आम्ही थांबलो नव्हतो. आम्ही प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आपली मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य बँक यांच्या माध्यमांतून जेवढ्या योजना करता येतील याचा प्रयत्न सुरुच ठेवला. पुन्हा सरकार आल्यानंतर आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. या परिषदेत १८ मागण्या ठेवण्यात आल्या होत्या त्यातल्या १६ मान्य करुन आपण जीआर काढला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.