ऑपरेशन सिंदुर अजूनही सुरूच; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

Operation Sindoor | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या मोहिमेत जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच, ही मोहीम अद्याप संपलेली नसून पाकिस्तानने कोणतीही आगळीक केल्यास भारत पुन्हा कठोर प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना म्हटले की, या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेले आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जादा माहिती दिलेली नाही.
हेही वाचा : आकुर्डीतील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद
राजनाथ सिंह म्हणाले, की भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती.