मुख्यमंत्री फडणवीस ‘एमपीएससी’मार्फत २० हजार पदांच्या भरतीसाठी नवीन सेवा नियमाची घोषणा करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (एमपीएससी) विविध बदल करण्यास प्राधान्य दिले आहे. आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही बदल करण्यात येणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारच्या विविध विभागांसाठी होणारी सरळसेवा भरती प्रक्रिया आता एमपीएससीकडे जाणार आहे. सरकारने नुकतीच ७० हजार पदांच्या भरतीची घोषणा केली असून यातील २० हजार पदे ही एमपीएससीकडून भरली जाणार आहेत. यासाठी आता सेवा नियम तयार केले जाणार असून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात नुकतीच बैठक घेत २० हजार पदांसाठी नवीन सेवा नियमांचा आढावा घेतला. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत नवीन सेवा नियमांना परवानगी दिली जाणार आहे.
सरळसेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घ्या अशी अनेक वर्षांपासूनची विद्यार्थी संघटनांची मागणी शासनाने मान्य केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा – माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान; ग्रामपंचायतींसाठी पाच कोटींचे पुरस्कार…
राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. संपूर्ण भरती प्रक्रिया प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येत प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.




