शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने शेती कर्जवसुलीला दिली स्थगिती

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकतीच मदत जाहीर केली आहे. यामध्ये सहकारी संस्थांकडून कर्जाचे सुसूत्रीकरण आणि वसुली एका वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या जीआरमध्ये नमूद केले की, राज्यातील 347 तहसीलमध्ये पिकांचे, शेतजमिनीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच मृत्यू, गुरेढोरे आणि इतर प्राण्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जांचे सुसूत्रीकरण, कृषी कर्ज वसुली एका वर्षासाठी स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या बाधित तहसीलमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय तीन महिन्यांचे वीज बिल देखील माफ केले जाईल, असे त्यात म्हटले आहे.
हेही वाचा – राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांचा हल्ला
राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 251 तालुके पूर्णतः तर 31 तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत.
तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य कृषी विभागाच्या मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे 65 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पाउस आणि पुरामुळे विशेषता मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे.




